बाजारात कलिंगडाची आवक वाढली
राज्यात जसजसा उन्हाचा चटका जाणवत आहे, त्याप्रमाणे बाजारात कलिंगडाची मागणी वाढत आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या सुरुवातीला आणि मुसलमान बांधवांच्या रमजान सणाच्या काळात राज्यातील लोक कलिंगड खरेदी करण्याकडे जास्त कल दर्शवतात.
मार्केटमध्ये कलिंगडाची मागणी ज्या प्रमाणे वाढत आहे, त्याच प्रमाणे कलिंगडाची आवकही वेगाने वाढत आहे. राज्यातील शेतकरी आपल्या शेतातून कलिंगडाची काढणी करून माल बाजारात आणत आहेत. यामुळे कलिंगडचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त झाला आहे, आणि त्याचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या मालावरील दरांवर दिसतोय. राज्यात मागील काही दिवसांपासून कलिंगडाचे भाव प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपयांनी घसरले आहेत.
सध्या मार्केटमध्ये कलिंगडाला सरासरी ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे. राज्यातील व्यापाऱ्यांच्या मते, पुढील काही आठवड्यांनंतर बाजारात कलिंगडाची आवक कमी होईल, कारण बहुतेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कलिंगडाची काढणी पूर्ण केलेली असेल. बाजारात आवक कमी झाल्यावर आणि जनतेकडून कलिंगडाची मागणी कायम राहिल्यास दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कलिंगडाचे पीक असेल, त्यांनी सध्याच्या घसरणीमुळे चिंता करण्याची गरज नाही; काही दिवसातच परिस्थिती पूर्वपदावर येईल. आणि पुन्हा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल.
बाजारात पपईला चांगला उठाव पाहायला मिळत आहे
सध्याचे मार्केट पाहता पपई हे असे पीक दिसत आहे ज्याला राज्यात आणि देशात चांगली मागणी आहे. देशात रमजान चालू असल्याने लोकांकडून पपईला प्राधान्य दिले जात आहे. त्यासोबतच उन्हाचा तडाखा जास्त असल्याने लोक पपई विकत घेण्यास प्राधान्य देत आहेत.
यामुळे देशातील आणि राज्यातील बाजारपेठांमध्ये पपईचे दर तेजी टिकवून आहेत. मागील काही दिवसांपासून पपईचे भाव स्थिर आहेत. सध्या बाजारात पपईला १ हजार ७०० रुपये ते २ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे. यंदा पपईची लागवड मागील वर्षाच्या तुलनेत सरासरीपेक्षा कमी झालेली आहे.
त्यामुळे बाजारात पपईची आवक कमी आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे पपईच्या दरांना आधार मिळाला आहे. बाजारातील अभ्यासकांचा असा अंदाज आहे की, पुढील काही आठवडे राज्यात पपईचे हे भाव स्थिर राहू शकतात. शेतकऱ्यांनी पपई लागवडीचे क्षेत्र वाढवले तर भविष्यात आवक वाढली, तर पपईच्या दरांवर परिणाम होऊ शकतो. पण सध्या तरी बाजारात पपई उत्पादकांसाठी ही परिस्थिती चांगली आहे.
साखरेच्या किमतीत सुधारणा
देशात साखरेच्या उत्पादनात घट झालेली पाहायला मिळत आहे. यंदा साखर कारखान्यांचे गाळप हंगाम लवकर संपत आहे, गुजरात आणि महाराष्ट्रात अनेक साखर कारखाने बंद झाले आहेत. यामुळे देशात साखरेच्या पुरवठ्यात घट होत आहे.
तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार यंदा साखर उत्पादनात १९ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. मागील २ महिन्यात साखरेच्या दरात १५ टक्यांनी वाढ झाली आहे. सध्या देशातील विविध बाजारात साखरेला ४ हजार ते ४ हजार ३ रुपये प्रतिक्विंटल या दरम्यान विकली जात आहे.
याचा लाभ साखर उत्पादक शेतकऱ्यांना आणि कारखान्यांना होईल. मात्र, सरकारने साखरेची आयात वाढवण्याचा निर्णय घेतला किंवा साखर निर्यातीवर निर्बंध लावले, तर हा अंदाज आपल्याला वेगळा पाहायला मिळेल.
सोयाबीनचे भाव दबावातच आहेत
बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा पुरवठा चांगला असल्याने बाजारात सोयाबीन दरावर दबाव कायम आहे. बाजारात सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे.
तसेच प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव ४,२०० ते ४,३५० रुपये प्रतिक्विंटल ठेवले आहेत. तरीही बाजारात सोयाबीनच्या भावात फारशी सुधारणा झालेली नाही. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव दबावात दिसत आहेत. त्याचा परिणाम हा देशातील सोयाबीन दरांवर पाहायला मिळत आहे.
जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात दरांची सुधारणा होत नाही आणि देशात सोयाबीनची मागणी वाढत नाही, तोपर्यंत सोयाबीनचे भाव मार्केटमध्ये दबावात राहतील. ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन साठवणीसाठी जागा असेल, त्यांनी सोयाबीन साठवून ठेवला पाहिजे आणि मार्केटमध्ये भाव वाढल्यानंतर विकण्यासाठी काढला पाहिजे, असा सल्ला काही बाजार अभ्यासक तज्ज्ञ देत आहेत.
कापसाचे दर टिकून आहेत
कापसाच्या बाजारातही उतार-चढावाची परिस्थिती दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कापसाचे दर ६५ सेंट प्रतिपाऊंडच्या जवळपास स्थिर आहेत. असे दिसते की दर थोडे वाढतात किंवा कमी होतात, पण पुन्हा त्याच पातळीवर येऊन थांबतात. यामुळे कापसाच्या दरांवर दबाव कायम टिकून आहे.
उन्हाळा चालू होत आहे आणि देशात कापसाची आवक कमी होताना दिसत आहे. त्यामुळे देशात कापसाला थोडा चांगला भाव मिळताना दिसत आहे. सध्या बाजारात कापसाला ७ हजार १०० रुपये ते ७ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. एप्रिल महिन्यापासून कापसाची आवक कमी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
यामुळे कापसाच्या दरात किंचित सुधारणा होऊ शकते. असा अंदाज देशातील कापूस बाजारातील तज्ज्ञ अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी शक्य असल्यास कापूस विक्रीसाठी योग्य वेळेची आणि दराची वाट पाहावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.