रौंदळ कुटुंबाची शेतीतील पारंपरिक वारसा आणि अनुभव
दूंधे गावातील रौंदळ कुटुंब हे मालेगाव तालुक्यातील परिसरात डाळिंब उत्पादक शेतकरी म्हणून ओळखले जातात. शेतकरी अमोल रौंदळ उर्फ मुन्ना यांचे वडील नानाभाऊ रौंदळ यांनी अनेक वर्षांपासून आपल्या शेतात डाळिंबाची शेती केली. नानाभाऊचे अचानक निधन झाल्याने शेतीची संपूर्ण जबाबदारी अमोल यांच्यावर आली.
BA पदवीधर असलेल्या अमोलने शेतीची जबाबदारी स्वीकारली. अमोलकडे डाळिंब शेतीचा संपूर्ण तंतोतंत अनुभव होता, पण त्याला शेतात काही तरी नवीन करायचे होते. अमोल डाळिंबासोबत टरबूज, मिरची आणि खरबूज अशी पिके दरवर्षी घेत होता,
पण शेतात नवीन प्रयोग करण्याच्या ध्येयाने त्याने यंदा पहिल्यांदाच शेतात काकडी पीक लावण्याचा निर्णय घेतला. आज या काकडीच्या अनोख्या प्रयोगाने त्याला मालेगाव परिसरात वेगळीच ओळख मिळाली आहे.
काकडी शेतीचा अनोखा प्रयोग
मार्केटमध्ये काकडीच्या खूप प्रकारच्या वाण आहेत, पण अमोलने 'नाझिया' या वाणीची निवड केली आणि एक एकर क्षेत्रात काकडीची लागवड केली. अमोलच्या या प्रयोगांमधून पहिल्या ५० दिवसांतच त्याला दहा टन काकडीचं उत्पादन मिळालं आणि काकडी विकून त्याला एक लाखांवर उत्पन्न झालं.
काकडीचे व्यवस्थापन करताना अमोलने काकडीची लागवड चार बाय दीड फूट अंतरावर केली. डाळिंब शेतकरी असल्याने झाडांना आधार देण्यासाठी असलेल्या काठ्या त्यांनी काकडी बागेत वापरल्या आणि एक छान प्रकारे स्ट्रक्चर तयार केलं. काकडीला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी इनलाइन ठिबक सिंचनाचे नियोजन केले,
जेणेकरून पाण्याची बचत होईल आणि प्रत्येक झाडाला योग्य प्रमाणात पाणी मिळेल. स्ट्रक्चरवर काकडीचा वेल लांबवण्यासाठी तारांची मदत घेतली. अमोलने तयार केलेले मजबूत स्ट्रक्चर आणि झाडांचे योग्य अंतर यामुळे शेतातील काकडीची गुणवत्ता चांगली राहण्यास मदत झाली.
काकडीची बाजारात मागणी
शेतातील काकडीची गुणवत्ता चांगली असल्याने जवळचे व्यापारी थेट अमोलच्या शेतावर येऊन माल घेतात. खतांचे नियोजन करताना अमोलने काकडीसाठी नैसर्गिक शेणखत आणि स्लरीचा उपयोग केला. काकडीचा बहार पाहता, काकडी हंगाम संपेपर्यंत ३० टन काकडीमधून मिळणाऱ्या उत्पादनाची अपेक्षा आहे. व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय आणि सध्या बाजारातील काकडीची मागणी यामुळे अमोलचा आणि कुटुंबाचा आत्मविश्वास वाढला आहे.
कौटुंबिक आधार आणि शेतीतील नवीन प्रयोग
अमोलच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. वडिलांच्या निधनानंतर खचून न जात पुन्हा आधीसारख्या जोमाने उभा राहण्यासाठी आई मंगलबाई रौंदळ आणि भावाने अमोलला पाठबळ दिले. वडील हयात असताना सुद्धा अमोल प्रामाणिकपणे शेती करत होता आणि त्यासोबत शेतात नवनवीन प्रयोग करत होता.
या वर्षी शेतात काकडी लावण्याचा निर्णय घेतला आणि काकडी शेताचे योग्य व्यवस्थापन, योग्यवेळी खतांचा वापर आणि काकडी शेतात योग्य औषधांची फवारणी या सर्व नियोजनामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. राज्यातील तरुण शेतकऱ्यांसाठी अमोलचे एक उत्तम उदाहरण आहे. शेतात जोखीम घेण्याचे धाडस, उत्तम नियोजन आणि मार्केटचा अभ्यास केला तर उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली नक्कीच पाहायला मिळेल.
काकडी पिकावर केलेला खर्च आणि मिळालेलं उत्पन्न
अमोलने काकडी पिकासाठी आपल्या शेतात किती खर्च केला आणि त्यामधून त्याला किती उत्पन्न मिळाले, त्याविषयी त्याने सविस्तर सांगितले.
१. शेती तयार करण्यासाठी म्हणजे मशागतीसाठी ३ हजार रुपये खर्च लागला.
२. काकडीचे बियाणे खरेदी करण्यासाठी आणि लागवड करण्यासाठी ५ हजार रुपये खर्च.
३. काकडी शेतात औषधे आणि फवारणीसाठी १० हजार रुपये खर्च लागला.
४. शेतात नैसर्गिक शेणखताचा वापर केला, त्यासाठी ४ हजार रुपये खर्च.
५. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी इनलाइन ठिबक व्यवस्था केली, त्यासाठी ८ हजार रुपये खर्च लागला.
६. शेतात मजुरी आणि काकडी तोडणीसाठी १० हजार रुपये खर्च लागला.
७. आतापर्यंत एकूण ४० हजार रुपये खर्च लागला आहे.
अमोलला पहिल्या ५० दिवसात १० टन काकडीचं उत्पादन मिळाले आहे आणि त्याला विकून १ लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले. म्हणजे ४० हजार रुपये खर्च करून दुप्पट नफा मिळवला आहे. काकडी बाग संपेपर्यंत ३० टन काकडीचे उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. उत्पादन वाढले तर उत्पन्न आणखी वाढेल.
अमोलचे तत्त्वज्ञान
अमोल म्हणतो, बाजारात जे विकले जाते, तेच आपल्या शेतात पिकवले पाहिजे. शेती करण्याच्या पद्धतीत बदल करणे ही काळाची गरज आहे. ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेता आणि बाजारातील मागणी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून आरोग्यासाठी उपयुक्त पिके घेतली तर कमी मेहनतीत अधिक उत्पन्न मिळू शकते. यामुळेच देशातील आणि राज्यातील शेतकरी कुटुंबाची प्रगती होईल. त्याचे हे तत्त्वज्ञान शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
उन्हाळ्यात काकडी शेतीचे महत्त्व
कमी खर्चात चांगले पीक हवे असेल तर काकडी सर्वात भारी पर्याय आहे. कमी खर्चात चांगले उत्पादन मिळते. काकडीमध्ये जास्त प्रमाणात पाणी असल्याने उन्हाळ्यात काकडी खाल्याने शरीराला खूप चांगले फायदे होतात. म्हणून उन्हाळ्यात काकडीची मागणी जास्त असते आणि बाजारात काकडीला चांगला भाव मिळतो.
महाराष्ट्रातील मालेगाव भाग हा खान्देशमध्ये येतो, त्यामुळे इकडे पाण्याची खूप जास्त कमतरता असते. अशा ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर करून काकडीचे पीक यशस्वी होऊ शकते. अमोलने केलेला प्रयोग, योग्य नियोजन आणि काकडी बाग सांभाळण्यासाठी केलेली मेहनत यामधून मोठी कमाई होऊ शकते. ते अमोलने सिद्ध करून दाखवलं आहे.
शेतीतील आव्हाने आणि उपाय
शेती कोणत्याही प्रकारची असो, त्यात आव्हाने असतात. असेच काकडी शेतीत सुद्धा आव्हाने असतात, जसे झाडावर किंवा काकडीवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव. पण अमोलने योग्य नियोजन करत योग्य वेळी औषधांची फवारणी आणि नैसर्गिक खतांचा वापर करून काकडी शेतात आलेली आव्हाने यशस्वीपणे पार केली.
त्याच प्रमाणे, बाजाराचा अभ्यास करून बाजारात होणाऱ्या चढ-उतारांचा अंदाज घेऊन अमोलने व्यापाऱ्यांशी थेट संपर्क साधला, ज्यामुळे त्याला मालाची विक्री सुलभ झाली आणि अपेक्षित उत्पन्नही मिळाले.
अमोलचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा आहे
अमोल रौंदळे यांनी त्यांच्या शेतात काकडी लागवडीचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. पारंपरिक शेती सोडून आपल्या शेतात नवीन पिकांचा प्रयोग करणं आणि बाजाराच्या गरजेनुसार शेती करणे हेखरे यशाचं सूत्र आहे.
कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी पिके एक उत्तम पर्याय ठरू शकतात. विशेषतः खान्देश सारख्या दुष्काळग्रस्त भागात अशा प्रयोगांची अत्यंत गरज आहे.
अमोल रौंदळे याचे भविष्यातील नियोजन
अमोलला काकडी लागवड क्षेत्र वाढवायचं आहे. अमोल म्हणतो, "यश मिळाले की आणखी मोठं स्वप्न पाहावंसं वाटतं. पुढच्या हंगामात मी २ एकरात काकडी लागवड करणार आहे. आणि त्यासाठी यापेक्षा चांगलं नियोजन करणार आहे." तसेच, तो मालेगाव तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा विचारही करतोय, जेणेकरून त्यांच्याही शेतीतून त्या शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळेल.