टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचे म्हंटले म्हणजे ज्या प्रकारे आपण जीवन विमा (Life Insurance) करण्यासाठी विमा करतो. त्याचप्रकारे टर्म इन्शुरन्स हा एक ठराविक काळासाठी घेतला जातो. टर्म इन्शुरन्स हे एक असे माध्यम आहे जे आपण नसल्यावर घरच्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतं.
टर्म इन्शुरन्स पॉलिसी कालावधीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला तर टर्म प्लॅननुसार त्याच्या परीवाला निश्चित रक्कम दिली जाते. टर्म इन्शुरन्स विमा परिवाराचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी मदत करण्याचे काम करतो. जर विमाधारकाचा इन्शुरन्स कालावधीत जिवंत राहिला, तर टर्म इन्शुरन्स संपल्यावर कोणत्याही प्रकारची रक्कम मिळत नाही.
टर्म इन्शुरन्सची वैशिष्ट्ये
✔️ टर्म इन्शुरन्स कमी प्रीमियममध्ये जास्त वर्ष कव्हर देण्याचे काम करते. यामुळे तुमच्या नंतर तुमच्या परिवारावर आर्थिक संकट येत नाही.
✔️ टर्म इन्शुरन्स तुम्हाला टॅक्स वाचवण्यासाठी सुद्धा मदत करते.
✔️ टर्म इन्शुरन्स विमा धारकासोबत दुर्दैवी घटना घडल्यास, परिवाराला इन्शुरन्स कंपनीकडून ठरवलेली रक्कम दिली जाते.
✔️ टर्म इन्शुरन्स विमा धारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, त्याच्या मागे कुटुंबातील नॉमिनी/लाभार्थीला इन्शुरन्स कंपनीकडून आर्थिक लाभ दिला जातो.
टर्म इन्शुरन्स कोणी घ्यावा?
१) या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या घरात एकमेव कमावते व्यक्ती असला आणि संपूर्ण परिवाराची आर्थिक जिम्मेदारी तुमच्यावर असेल. तुम्हाला वाटत असेल की या महागाईच्या काळात तुमच्या परिवारावर आर्थिक संकट येऊ नये. म्हणून तुमच्या बचतीच्या काही पैशांमधून टर्म इन्शुरन्स घायला काही हरकत नाही. टर्म इन्शुरन्स घेण्याचा निर्णय हा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी योग्य निर्णय असेल.
२) विवाहित व्यक्तीवर आणि घराची संपूर्ण जबाबदारी घेतलेल्या व्यक्तीवर संपूर्ण घराची आर्थिक जबाबदारी असते. मुलांचे भविष्यातील शैक्षणिक खर्च, गृहकर्ज आणि त्यासोबत इतर खर्च, या सर्व गरजा पाहाव्या लागतात. अशा व्यक्तींना आपला टर्म इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे.
३) जर तुम्ही गृहकर्ज, कार लोन, शैक्षणिक कर्ज किंवा अन्य कर्जे घेतले असतील, तर तुम्हाला टर्म इन्शुरन्स घेणे खूप गरजेचे आहे. कारण तुमच्या मृत्यूनंतर परिवारावर तुम्ही घेतलेल्या कर्जाचा जास्त भार पडू नये म्हणून या आर्थिक संकटापासून तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी टर्म इन्शुरन्स काढणे एक चांगला पर्याय आहे.
४) जगात खूप मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग आहे. त्यासोबत लहान व्यावसायिक सुद्धा आहेत. त्यांचे उत्पन्न ठराविक नसते. त्यांच्या मृत्यू नंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यांना आर्थिक पाठबळ लागावे म्हणून अशा व्यक्तींनी त्यांचा टर्म इन्शुरन्स करणे खूप महत्त्वाचे आहे.
५) टर्म इन्शुरन्स हा वयानुसार वाढत जातो. याला घेण्याचे उत्तम वय हे २५ ते ३५ वयोगटात असते. या वयोगटातील व्यक्तींनी टर्म इन्शुरन्स घेतला तर त्यांना प्रीमियम स्वस्त मिळतो. टर्म इन्शुरन्समध्ये असे म्हटले जाते जितक्या कमी वयात तुम्ही इन्शुरन्स काढला, तितका कमी प्रीमियम तुम्हाला तुमच्या इन्शुरन्सवर भरावा लागेल.
टर्म इन्शुरन्स कोणी घेऊ नये?
१) तुम्हाला कोणत्याही आर्थिक प्रकारची जबाबदारीनसेल, तुमच्या वर परिवाराची आर्थिक गरज नसेल, म्हणजे तुमच्या कमाईवर तुमचे कुटुंब अवलंबून नसेल, इतर ठिकाणी गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला टर्म इन्शुरन्स काढण्याची गरज नाही.
२) टर्म इन्शुरन्स हा प्रकार आर्थिक जबाबदाऱ्या असलेल्या व्यक्तीसाठी असतो. तुम्ही निवृत्त झालेले असाल, तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर असेल, तर तुम्हाला टर्म इन्शुरन्स काढण्याची गरज नाही. कारण ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे टर्म इन्शुरन्स काढण्यास बहुतेक कंपन्या नकार देतात.
३) तुमच्या कडे आधीच मोठ्या प्रमाणात बँक बॅलन्स आहे, इतर ठिकाणी गुंतवणूक केली आहे. बँकांमध्ये FD केल्या असतील. तुमच्या नंतर तुमच्या परिवारावर आर्थिक अडचण येणार नाही. तर तुम्हाला टर्म इन्शुरन्स काढण्याची गरज नाही.
४) कमी कालावधीसाठी तुम्ही विमा शोधात असणार तर टर्म इन्शुरन्स तुमच्यासाठी नाही. कारण टर्म इन्शुरन्स पर्याय हा दीर्घकालीन संरक्षणासाठी घेण्यात येतो. जर तुम्हाला कमी कालावधीसाठी हवा असेल तर तुमच्यासाठी इतर पर्याय उपलब्ध आहेत, जसे ULIP, Endowment Policy किंवा Health Insurance तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील.
टर्म इन्शुरन्स घेताना कोणती काळजी घ्यावी?
✔️ टर्म इन्शुरन्स निवडताना विमाची रक्कम ही तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या १० ते १५ पट असेल, इतकीच निवडावी.
✔️ टर्म इन्शुरन्स हा लांब मुदतीसाठी निवडा म्हणजे तुमच्या वयाच्या ६० ते ६५ वर्षांपर्यंत तुम्हाला इन्सुरन्सचे संरक्षण मिळेल.
✔️ टर्म इन्शुरन्स काढताना विमा कंपनीविषयी संपूर्ण माहिती तपासा. स्वस्त प्रीमियम मिळवण्यासाठी चुकीची कंपनी निवडू नका. असे केले असता तुमचे नुकसान होऊ शकते.
✔️ टर्म इन्शुरन्समध्ये मिळणाऱ्या सुविधांची तपासणी करा, जसे की Accidental Cover, Critical Illness Rider तुमच्या विम्यात कव्हर केले आहेत का. मगच टर्म इन्शुरन्स घ्या. म्हणजे तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही.
निष्कर्ष
तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी टर्म इन्शुरन्स हा उत्तम पर्याय आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला टर्म इन्शुरन्सची गरज असेल असे नाही. ज्या लोकांना खरोखरच कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आहे, ज्या व्यक्तींवर कर्ज आहे आणि ते वारंवार आजारी पडत असतात,
ज्यांना आर्थिक पकड हवी आहे, त्याच लोकांनी इन्शुरन्स काढावा. तसेच ज्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची जबाबदारी नाही किंवा त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांना टर्म इन्शुरन्स घेण्याची काहीही गरज नाही.