गोरख शेलार शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल
काय झालं गोरख शेलार यांच्या सोबत की त्यांना इतके मोठे टोकाचे पाऊल उचलावे लागले आणि थेट उभ्या कोबीच्या शेतात मेंढया सोडाव्या लागल्या. गोरख शेलार हे विखरणी, तालुका - येवला, जिल्हा - नाशिक येथील रहिवाशी आहेत. त्यांनी त्यांच्या शेतात भाजीपाला लावण्याचा निर्णय घेतला आणि कोबी बाग त्यांनी शेतात फुलवली.
त्यांनी कोबीचे संगोपनही खूप काळजीपूर्वक केले आणि पाहतापाहता शेतात कोबी आली. गोरख शेलार यांनी कोबी काढून ती नजीकच्या बाजारपेठेत नेली तर तिथे कोबीला ५० पैशा किलोप्रमाणे विकली जात होती. यामुळे त्यांनी केलेला खर्च आणि कोबी काढण्यासाठी लागणाऱ्या मजुरीचा खर्च कोबी विकूनसुद्धा निघत नव्हता. त्यांच्या समोर दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता, म्हणून त्यांनी थेट शेतात मेंढया सोडल्या.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव नाही
आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारात योग्य बाजारभाव मिळत नाही आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चात वाढ झाली, पण त्यांच्या शेतीमालाला विक्री दर मात्र खूप कमी आहे. अशातच शेतकऱ्यांनी पिकांवर केलेला खर्च सुद्धा निघत नाही आहे.
आणि शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय. यामुळे देशातील आणि राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात पडले आहेत. म्हणून बहुतेक शेतकरी गोरख शेलार यांच्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांची व्यथा
गोरख शेलार यांनी त्यांच्या कोबी पिकात मेंढ्या सोडण्याचा निर्णय म्हणजे फक्त त्यांचा संताप नसून तर संपूर्ण राज्यातील कृषी क्षेत्रातील दिवसेंदिवस बिकट होणारी परिस्थिती दर्शवणारी आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव त्यासोबतच स्थिर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम केले पाहिजे.
खूप वर्षांपासून शेतकरी या मागणींसाठी लढत आहे. पण सरकारकडून फक्त घोषणा केली जाते. सत्यात ती गोष्ट सरकारकडून केली जात नाही. सरकारच्या अशा हलगर्जीमुळे शेतकरी आज संकटात सापडलाय. सरकारने उपाययोजना करून शेतकरी बांधवांना न्याय दिला पाहिजे.
शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून काढण्यासाठी तातडीने योग्य निर्णयांची गरज आहे
सध्या देशात वाढती महागाई पाहता शेतीसाठी लागणारा खर्च जास्त आणि मालाला बाजारभाव कमी यामुळे देशातील शेतकरी संकटात सापडला आहे. या मधून शेतकरी बांधवांना बाहेर काढण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करून कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे.
जेणेकरून शेतकऱ्यांचा मालाला हमीभाव आणि स्थानिक बाजारपेठेत योग्य बाजारभाव मिळावा. नाहीतर देशातील शेतकऱ्यांवर अजून अधिक वाईट दिवस येऊ शकतात. गोरख शेलार यांचा निर्णय हा देशातील सर्व शेतकरी बांधवांची व्यथा दर्शवणारी घटना आहे. सरकारने पिकांना योग्य हमीभाव आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा ही काळाची गरज आहे.